दाब,मनवाणी :24-03-2021
गोरंबा,काकरपाटी,खांडबारा:25-03-2021
खुंटामोळी,गौऱ्या, रमसुला :26-03-2021
कालीबेल,कुंडल :27-03-2021
सुरवाणी,काठी,मांडवी :28-03-2021
मोलगी, काकडदा :29-03-2021
जामली,असली,राजबडीँ :30-03-2021
जमाना,धनाजे :31-03-2021
बुगवाडा :01-03-2021
➤सातपूडा होली महोत्सव Video Click Here (येथे पहा.) ➤
सातपूडा आदिवासी होली महोत्सव ( धंडगाव & अक्कलकुवा ) :
जि. नंदुरबार ता. धंडगाव & अक्कलकुवा येथील होळीस हजारो आदिवासींची उपस्थिती जिल्ह्य़ातील सातपुडय़ाच्या पर्वतरांगा पांरपरिक आदिवासी होळी सणात न्हावून निघाल्या असून सर्वत्र होलिकात्सवाचा जल्लोष दिसून येत आहे.
जिल्ह्य़ातील सातपुडय़ाच्या पर्वतरांगा पांरपरिक आदिवासी होळी सणात न्हावून निघाल्या असून सर्वत्र होलिकात्सवाचा जल्लोष दिसून येत आहे. ७५० वर्षांपेक्षा अधिकची पंरपरा असलेल्या सातपुडय़ातील काठी संस्थानची मानाची ‘राजवाडी होळी’ गुरुवारी पहाटे पेटविण्यात येत आहे.
आदिवासी संस्कृतीत होळी सण मोठा मानला जातो. त्यातही नंदुरबार जिल्ह्य़ातील आदिवासी होळीचा जल्लोष हा सर्वदूर परिचीत झाला आहे. या होलिकात्सोवाचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक दाखल होत असतात. चार दिवसांपासून सातपुडय़ातील दऱ्या-खोऱ्यासह संपूर्ण जिल्ह्य़ात होळीचा ज्वर वाढला असून विविध ठिकाणच्या भोंगऱ्या बाजारांनी या होलिकात्सवाला सुरवात झाली आहे. या बाजारातून आदिवासी होळीची खरेदी करतात. काठी संस्थानाच्कया राजवाडी होळीला आदिवासींमध्ये विशेष महत्व आहे. होळीत वापरली जाणारी उंच काठी गुजरातच्या जंगलातून आणण्यात येत असते. या ठिकाणी राजा उमेदसिंग यांची गादी आणि त्यांच्या शस्त्रांच्या पूजनानंतर ढोल आणि बिरीच्या तालावर आदिवासी नृत्यांनी सातपुडा गजबजून गेला. सकाळी सहाच्या सुमारास ही मानाची काठीची राजवाडी होळी पेटविण्यात येते. काठी प्रमाणेच असली, रोझवा पुनर्वसन, जावदा वसाहत आणि वडछील वसाहतीतही राजवाडी आदिवासी होळीचा उत्सव साजरा करण्यात येतो. वडछील वसाहतीमध्ये तर विविध प्रकारच्या आदिवासी पांरपरिक नृत्य, ढोल वाजन अशा स्पर्धा घेण्यात येतात.
होळीसाठी नवस ठेवून खास बुध्या, बावा, घेर, मोरख्या, कहानडोखा, मोडवी, शिकारी आदि प्रकारच्या पांरपरिक होळीच्या प्रतिकांचा पेहराव आदिवासींनी केला आहे. यासाठी होळीच्या पाच दिवस आधीपासूनच ब्रम्हचर्यत्व धारण करावे लागते. खाट अथवा पलंगावर न झोपता जमिनीवर झोपूनच या कार्यकाळात होळीला वंदना दिली जाते. विविध रुप धारण केलेले आदिवासी काठी होळीनंतर तब्बल आठ ठिकाणची होळी पायी जाऊन आपला नवस फेडून होलिकात्सव साजरा करतात. पुढील पाच दिवस काकर्दे, मोलगी, तोरणमाळ, गौऱ्या, सुरवाणी, जामली, जमाना, धनाजे, मांडवी, सुरवाणी, बुगवाडा अशा ठिकाणी होळी उत्सव होणार आहे.
सातपुड्याच्या पर्वतरांगेत वास्तव्य करणारे आदिवासी बांधवांचा 'होळी' सण हा दीपोत्सवापेक्षा कमी नसतो. होळीची चाहूल लागताच आदिवादींना भोगंर्या बाजाराचे वेध लागत असतात. आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये शेकडो वर्षांपासून होळीचा सणाला भोंगर्या बाजाराची परंपरा चालत आली आहे. पंधरा ते वीस दिवस चालणार्या भोंगर्या बाजारात आदिवासी बांधवांचे जीवन संस्कृती आपल्याला अनुभवास येते असते. सातपुड्याच्या पर्वतरांगेत पावरा, पाडवी, गावीत, भिल्ल अशा प्रमुख आदिवासी जमाती आढळतात. या जमातीत दिवाळी आणि होळी या सणांना असाधारण असे महत्त्व आहे.
सातपुड्यात असलेल्या आदिवासी पाड्यात विविध ठिकाणी पाच दिवसाचा होळी सण साजरा केला जातो. पाच- सहा पाडे मिळून एकच होळी पेटविली जाते. पारंपारिक पध्दतीने आदिवासीबांधव सपत्नीक होळीचे पुजन करतात. होळी प्रज्वलीत झाल्यानंतर आदिवासी महिला- पुरूष मोहाच्या फूलांची दारू (कच्ची दारू) सेवन करून ढोल वाजवून होळीभोवती नाचगाणे करतात. काही लोक सोंगे धारण करतात. काही लोक नवस फेडण्यासाठीही सोंगे धारण करून होळीला नैवेद्य दाखवितात. सोंगाचा नवस हा पाच वर्ष करावा लागतो, त्याला मधेच खंड पाडून चालत नाही. नवस मधेच बंद पाडला तर देवाचा कोप होतो, अशी ही समजूत आदिवासी बांधवांमध्ये आहे.
होळी सणासाठी फाग (देणगी) मागण्याची पध्दत आहे. आदिवासी महिला- पुरुष आदिवासी पाड्यामध्ये घरोघरी जाऊन फाग मागत असतात. देणगी गोळा करून पाच ते सहा पाडे मिळून होळीचा सण साजरा केला जातो.
![]() |
|
*भोंगऱ्या*
भोंगर्या' हा होळी सणाच्या अगोदर येणारा व आदिवासींमध्ये विशेष लोकप्रिय असलेला 'बाजार' (जत्रा) होय. दहा ते बारा आदिवासी पाड्यांच्या मध्यवर्ती भागातातील एका गावात हा बाजार सर्वानुमते भरविला जात असतो. प्रत्येक आदिवासी पाड्यांचे मुखीया नदी काठी एकत्र येऊन बाजार भरविण्याबाबत निर्णय घेत असतात. होळी सणाअगोदर एक दिवस निश्चित करून बाजाराचा दिवस ठरविला जातो. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील आदिवासी बांधव ढोल, पावरी घेऊन बाजाराच्या गावी नाचायला येतात. आदिवासी तरूण- तरूणी मोठ्या संख्येने या बाजारात उपस्थित होत असतात. प्रत्येक गावातून आठ ते दहा गृप नाचण्यासाठी येत असतात.
भोंगर्या बाजारात होळीसाठी लागणारे विविध साहित्य खरेदी केले जाते. नारळ, खोबरे, दाळ्या, गूळ, साखरेचे हार, कपडे, रंगीत कागद, रंग आदी वस्तूंची खरेदी करून आदिवासी बांधव आपाआपल्या गावात परततात. होळीच्या दिवशी जंगलात जाऊन बांबूची अथवा विशिष्ट प्रकारची लाकडे तोडून होळीच्या ठिकाणी जाळतात. त्या अगोदर त्यांची पूजा केली जाते. ढोलीला नवीन चामडे चढवतात.
(होळीपूर्वीचा हाट बाजार ) :
*दांडा* महिना चालू झाला की होळी भरण्याच्या ठिकाणी होळीचा दांडा उभारला जातो, दांडा महिण्याअगोदरच शेतीची कामे उरकवली जातात जेणे करून वर्षातून एक महिना पुरेसा आराम घेता यावा.
*पण दांडा महिन्यात लग्न केली जात नाही* ह्याच महिन्यात होळीच्या आदल्या दिवशी भरतो तो म्हणजे *भांगोर्या बाजार* होळीच्या खरेदीचा केंद्रबिंदू, होळीचा हाट बाजार..... बाजाराचा पहिला दिवस हा *गुलाल्या बाजार* म्हणून प्रचलित आहे, गुलाल उधळून भोंगऱ्या बाजाराची सुरवात केली जाते,होळी चालू झाली याचे संकेत देण्याकरता गुलाल उधळला जातो आणि म्हणूनच होळीपूर्वीचा शंखनाद अस ह्या दिवसाला म्हणता।
फाल्गुनोत्सवानिमित्त भरणारा भोंगर्या बाजार हा पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. परंतु या बाजाराबद्दल अनेक गैरसमज बाहेरच्या जगात आहेत . मुली पळविल्या जातात, लग्न करण्यासाठी जोडपे पळतात, गुलाल लावला जातो आणि आपला जीवनसाथी निवडला जातो वगैरे ।
परंतु असा कुठलाही प्रकार या बाजारात होत नाही हे ठामपणे पटवून द्यायला हवे. पारंपारिक कारण असे की दांड्याच्या महिन्यात कोणतेही व्यवहार केले जात नाही, मंगल कार्य केले जात नाही, लग्न जोडले जात नाहीत, मग मुली पळवून लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही. (गावातील जेष्ठ मंडळी नुसार एक म्हण अशीही प्रचलित आहे की जो या काळात लग्न करतो त्याला मूलबाळ होत नाही, हा झाला प्रचलित अंधश्रद्धेचा भाग) समाजातील कोणत्याही आपल्या वरिष्ठ मंडळींना विचारल्यास याची प्रचिती येते, पोरीला साधा गुलाल लावायच सोडा, छेड जरी काढलीत तरी महायुद्ध होईल अशी परिस्थिती असते, कारण या बाजारात प्रत्येकजण शस्त्राशस्त्र घेऊन असतो, त्यामुळे पोरीला पळवून नेण्याची हिम्मतही कुणी करू पाहणार नाही.
ज्याठिकाणी भोंगर्या बाजार भरतो त्याठिकाणी आजू-बाजूच्या परिसरातील आदिवासी पावरा बांधव एकत्र येतात.
वर्षभराचे अन्नधान्य, नवीन कपडे परिधान व खरेदी केले जातात, होळीपूजनासाठी लागणारे साहित्य विकत घेतली जातात, होळी सुरू झाली या जल्लोशात पारंपरिक ढोल, बासरी आदी वाजवून मनसोक्त नाचले जाते. होळी हा आदिवासी समाजाचा पवित्र सण आहे आणि दांडा हा पवित्र महिना, त्यामुळे याचे जितके अप्रचार आहेत ते अगदी खोटे आहेत, होळी हा सण म्हणजे उल्हासाचा आणि जनसम्पर्क साधून लोकांना एकत्र आणण्याचा पूर्वजांचा प्रयत्न आहे, सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी केलेला पूर्वजांचा एक आनंद सोहळा आहे.
या अश्या महान सोहळ्याचा आणि पर्वाचा अपप्रचार होणे हे दुर्दैवी, ज्या जल्लोषात आपण हा सण साजरा करतो, त्याच प्रमाणे प्रखरपणे या बद्दलची खरी माहिती लोकांपुढे आणावी आणि प्रचार करावा ही सर्व समाजबंधूंना विंनती।
Story 2 :
"ओली आवे बारा मोयना ओली या,
ओली आवे खोकलू वोलती ओली या...!"
अशी होळीविषयी बोलीगीते सातपुड्यातल्या गावपाड्यात गायली जाऊ लागली आहेत. होळी म्हणताच आबाल-वृद्धापासुन ते पोरा-सोरापर्यत सर्व आपापल्या परिने होळीमातेची आराधना करण्यास सज्ज होतात. आदिवासींनी निसर्ग संस्कृतीची समरस होऊन साजरा केलेला होळी हा सण त्यांच्या सांस्कृतिक, पारंपारिक जीवनमुल्याची असलेली नाळ घट्ट करणारा अफलातून असाच सण आहे. होळी हा फक्त 1-2 दिवसाचा उत्सव नसून संबंध सातपुड्यात महिनाभर चालणारा महोत्सव आहे. यात आदिवासींचे निसर्ग संस्कृतीची असलेले नाते, जंगल-जल-जमीन यावर आधारित जीवनपद्धती, त्या जीवनपद्धतीवर आधारित आदिवासी संस्कृती, प्रथा-परंपरा, रिती-रिवाज, देव-देवता, बोलीगीते, पोशाख, समूहनृत्य, दान-दागिने, पारंपारिक वाद्ये अशा अनेक आदिवासीच्या वेगळेपणावर आधारित समूहाचा हा सण आहे. ज्यात आदिवासी आपली सर्व सुख-दुःखे विसरून आनंद, उत्साह व समरसता याचा मिलाफ घडवून आणतो. आणि यातूनच अवघ्या विश्वाला साद घालणारी आदिवासी संस्कृती प्रत्ययास येते, सर्वाना एकञित करुन समुहजीवनाचे धडे देते. यावेळी "होळी म्हणजेस आदिवासी आणि आदिवासी म्हणजेस होळी" हे समीकरण बनते, आणि आदिम अस्तीत्व-प्रतीकांची जीवंत अनुभूती घेता येते...!
(दांड) माघ अमावस्येला निघलेल्या नव्या को-या चंद्रदेवतेला (नोवू) नमन करुन होळी उत्सवाची सुरवात होते. येथूनच पथ्याची (पालनी) सुरवात होते. नेराय, गोवाण* आणि इतर गोष्टीसाठी पालनी होत असताना जो कोणी मोरखी, बावा तथा ढाणका डोकोअ होईल तो मांसाहार वर्ज्य करतो. स्ञियांना स्पर्श न करणे, खाट-खुर्चीवर न बसणे, स्वतंञ ( अलिप्त ) राहून कमी साधने वापरणे, चपला न घालणे अशी अनेक पथ्ये पाळली जातात. पालनीचा कालावधी पाच-सात-नऊ दिवसाप्रमाणे कमी अधिक असतो. यात पथ्ये पाळताना कचुराई केलो तर होळीचा कोप होतो म्हणतात. आणि या दिवसापासूनच मोरखी, बावे होण्यासाठी जी सामानाची जुळवा-जुळव करावी लागते. त्याची शोधाशोध, साफ-सफाई व जमवा- जमव सुरू होते. गावात होळीचा माहोल तयार होतो.
साधारण सप्टेंबर महिन्यापासुन सातपुड्यातील आदिवासींची रोजगार शोधण्यासाठी स्थलांतर होण्यास सुरवात होते. पावसाच्या बेभरोसे शेतीवर आदिवासींच भागत नाही आणि स्थानिक पातळीवर रोजगार नाही म्हणून आदिवासींची गाव-कुंटूबे ओस पडतात. म्हातारी-वृद्ध मंडळी व लहान पोरं-बाळं तेवढी घर, गाई-गुरांच्या देखभालीसाठी असतात. सातपुड्यातली गावं फेब्रुवारीपर्यत तरी अशीच भकास, उदास व सुनी-सुनी वाटतात. जशी वसंताची चैञपालवी नव्या सुरवातीची चाहूल घेऊन येते तशी होळी आदिवासीत नवचैतन्य घेऊन येते. उत्साह उधळायला, मनसोक्त नाचाया- गायला लावते. खरतर होळी आदिवासींच्या दु:खावर पांघरुण घालते. दुःख विसरुन आनंदाचा शोध घ्यायला लावते. नवनिर्मितीची प्रेरणा देते. दुःख-गरिबीतही आनंदाने नाचता येते. होळी अशीच सहजपणे सर्वाना सामावून घेते. नवीन उत्साह व उभारी देते. यावेळी सातपुड्यातल्या आश्रमशाळा, शाळा ओस पडतात. वसतीगृहात राहून शिकणारी आदिवासी पोरं गावाकडे परतण्यास आतुर होतात. न चुकता सर्वाची पावले होळीवर थिरकण्यासाठी गावाकडे परतात. गावं कशी पुन्हा एकदा ढोलच्या तालावर एकञ येत नाचू लागतात. एकमेकांशी एकरुप होऊन होळीची तयारी केली जाते. होळी नाचली- गायली जाते.
नोवू दिसल्यानंतर आदिवासी गाव-पाड्यावर ढोल- ढोलगीच्या तालात युवक-युवतीचा नाच रंगतो. ही गावातील पोरं-पोरी, लहान मुलं याची होळी असते जी गावातील काही मुलं जंगलात जाऊन बांबू उखळून आणतात. आंब्या-जांभूळाची पाने असलेल्या फांदी बांबूला बांधून पेहराव, सजावट केली जाते. बरोबर बाअडी, सानक्ये, साणी* बांधून सोबत 'ओली डोहू' आणला जातो. गावाच्या मध्यभागी 'ओली दोअ' त्यात लाकडाच्या साहाय्याने होळी उभी करुन ठेवतात. मग 'ढोल'वर थाप पडते, फेर धरला जातो, तालाला-ताल मिळतो आणि सहज सुंदर नृत्य रंगते. मुलीं होळीची बोलीगीते गातात आणि युवक आनंद व्यक्त करताना आदिवासी सुरात लय पकडतात. हा 'गोटूल'चाच एक प्रकार. युवक-युवतीवर वेळेचे निर्बंध नसते. आणि गावातील सर्व मंडळी अर्ध्या राञीपर्यत होळी मध्यभागी करुन नाच-नाचतात. यावेळी गायली जाणारी होळी विषयक गीते निसर्गाची आदिवासींच असलेलं नातं स्पष्ट करतात. हे पुरातन काळापासुन आजपर्यत न चुकता चालत आलेलं आहे. चालत राहिल.
होळी निमित्त सर्व गावकरी एकञ येतात. सामानाची जुळवा-जुळव करताना आपसूकच अडी-अडचणीवर चर्चा होते. मुख्य होळीच्या वेळी होणा-या कार्यक्रमाची ही रंगीत तालीम असते. ढोल चढवणे, चामडी बदलणे, नाडू गोवणे अशी कामं करुन ढोल तयार होतो. ढोलगी, खाट, मांदल, धा-या-तलवारी, हुप, मोरखी पिसे, टोपा, काहटे, डोवे, उंबराची माळ, दान-दागिने, इत्यादीची तयारी होते. काही वस्तू जंगलेत, काही गावात तर काही बाजारातून आणल्या जातात. होळी येईपर्यत मोहाची दारु गाळून तयार केली जाते. आजू-बाजूच्या गावपाड्यात होळीसाठी खोबर (निमंञण) धाडली जाते. मग गावकरी विशिष्ट दिवस ठरवतात व त्याप्रमाणे एक-एक करुन संबंध परिसरात ऐकमेकांत मिळून-मिसळून होळीचा आनंद घेतला जातो. प्रत्येकाची कामे स्वतंञ असली तरी सहकार्याशिवाय होळी होत नसते. यामुळे गावक-याची मने जुळतात. गावात एकोपा नांदतो.
होळीच्या आवश्यक पुर्वतयारीनंतर खरा रंग येतो तो देवहोळी पेटविल्यानंतर. दाब (ता. अक्कलकुवा) येथे होणारी देवहोळी संपूर्ण सातपुड्यातल्या उत्सवाची नांदी असते. या होळीसाठी सातपुड्यातल्या सर्व भागातून डाया लोक उपस्थित राहून संबंध पहाडास होळी उत्सव शांततेत पार पाडण्याचा संदेश देतात. ह
सातपुड्याच्या ह्या होळीचा ढोल-ताशांचा गजर पूर्ण पहाडात दूमदूमत राहतो. मग एक-एक करुन मोलगी-धडगाव परिसरातील गावहोळीचा 'सीजन' सुरु होतो. काही ठिकाणी गावहोळीपूर्वी भोग-या बाजार ( होळीच्या तयारीसाठी आवश्यक सामान खरेदी) भरतो. हाच काही ठिकाणी 'मेलादा' म्हणूनही ओळखला जातो.
गावहोळीच्या दिवशी सायंकाळी मोरखी, बावा यांची पारंपारिक वेशभूषा त्यांच्या ठरलेल्या बडव्याकडून सर्व सामान ( काहटे, मोरपिसे, दान-दागिने, ढोलगी, टोपा, माळा, तलवारी-धा-या इ.) पूजा करुन परिधान केले जाते. मोरखी, बावा शरीर राखानेही ढिबून घेतात. हातात धा-या तलवारी, डोक्यावर मोरपिसे-टोपा चढवून गळ्यात ढोलगी, कमरेला काहटे-डोवे असा वेशधारी आदिमांचा ताफा वाजत-गाजत, नाचत-गात बाहेर पडतो. राञभर जो तो आपापल्या धुंदीत होळीमातेची आराधना करतो. राञीची झिंग चढल्यावर सकाळ कशी होते तेही कळत नाही.
सातपुड्यातली प्रत्येक गावहोळी विषेश असतेच. पण परिसरातील सर्व लोकांच्या मनात घर केलेली होळी म्हणजे काठी येथील राजवाडी होळी व मोलगीची प्रसिद्ध होळी.! येथे साजरी होणा-या होळीच वर्णन करणंच अशक्य. किमान 200-300 ढोल, मोरखी-बावा यांची 15-20 हजाराची तुफान गर्दी आणि साथीत बेधूंद होऊन नाचणारी लाखभर लोकं! यात नियोजित असा कोणताच भाग नसतो. आपापल्या परिने सर्व होळीला येत असतात. मिरवायला धा-या-तलवारी असतात, असतात गावक-याचे तांडे (मेलू). स्ञियांची संख्याही तेवढीच जास्त, मग राञभर होणारी होळीगीते व आदिम नृत्य. राञीच्या अंधार-उजेळात येथे ना कधी स्ञियांची छेडखानी होते ना कोणतीही हाणामारी. सर्व कसे एकमेकंत मिळून- मिसळून जातात. समतापर्व गाणारी ही होळी राञभर स्ञि-पुरुष एकञ येऊन साजरी करतात. येथे ना दुजाभाव असतो, ना लहान-मोठेपणाचा दर्प. सर्वाना आनंद घेण्याची स्वतंञ मूभा! होळीत गायली जाणारी बोलीगीते आदिम मौखिक साहित्याचा ठेवा आहे. पण त्याचबरोबर 'मामाच्या पोरी' व इतर गोष्टीवर पुरुष मंडळीनी योजलेली गीते अफलातूनच! होळी ही म्हणून बघण्याची गोष्ट नाही. होळी फेर धरुन सहभागास प्रवृत्त करते, राञभरचा उत्साह देते.
होळीची राञ कशी सरते हे होळीत सहभागी झालो की कळतच नाही. दांडला दंडवत करता-करता राञी तीनच्या सुमारास होळीला पेरविण्यास सुरवात होते. राञभर होळीत येणारा प्रत्येक मोरखी, बावा न चुकता 'ओली दोअ' मधील माती बाजूला सारतो. आणलेली लाकडे लावून होळी उभी करतो. प्रांतः सकाळी पाचच्या सुमारास होळी पेटवतात तो खरा उत्कटतेचा क्षण असतो. होळी पेटवल्यानंतर पूर्वेकडे खाली पडली तर वर्ष सुख-समाधानाने जाते म्हणतात पण दुस-या दिशेला पडली तर वर्षभरात विघ्नं येतात म्हणतात. पेटवलेल्या होळीच्या जळत्या आगीतून मोरखी-बावा राख उचलतात. ती माथ्यावर अभिमानाने वंदन करतात. मग होळीवरुन परतण्यास सुरवात होते. सकाळी पायवाटेला धपाधप पावले टाकीत परतणारी लोकं पाहताना, त्यांच्या चेह-यावरील समाधानाचं तेज न्याहाळताना मन 'आदिवासी'च होऊन जाते.
होळी झाली की सुरवात होते ती मेलादा (भोंग-या ) पर्वाची. मेलादा हे आदिवासी युवक-युवतीच्या आकर्षणाचे असते. मेलादात 'फाग मागण्याची व मेलादा पूजण्याची प्रथा खूप जुनी आहे. यात पारंपारिक वेशभूषा, वाद्ये तथा आदिवासीच्या ताकतीचे सुरेख प्रदर्शन केले जाते. नृत्याशिवाय तर मेलादा होऊच शकत नाही. मेलादा नृत्यात सहभागी होण्याची मजा काही औरच असते. मोलगी व जामली ( ता. अ.कुवा ) येथील प्रचंड गर्दीचे मेलादा बाजार डोळ्याची पारणे फेडतात. सर्वात शेवटचे मेलादा बाजार धनाजे व बुगवाडे ( ता. धडगाव ) येथे संपन्न होतात. यानंतर गावातील मोरखी मंडळीची गावाच्या प्रत्येक घरो-घरी फेरी निघते. कुंटूब-प्रमुख अत्यंत तन्मयतेने त्यांची सेवा करतो. अंगणात होळीचे नृत्य म्हणजे होळीमातेचे चरण घराला स्पर्श झाले असे समजले जाते. मग सर्व गावकरी मिळून गावाच्या नदी-नाल्यावर जाऊन पालनी सोडतात.
होळी तशी काहीही असो, दरवर्षी उत्साहात साजरी होते. या वर्षीची होळीही अशीच खास असते. मी तर महिना भरापासून होळीची वाट पाहतच आहे. मिञमंडळी बरोबर आम्ही जाऊन नाचणार. गाणार. मज्जाच मजा. तसं होळीला जाताना कोणतीही खुण-गाठ बांधून जायचे नसते. पण तेथे जाऊन कोणीही खाली हात परतत नाही हा इतिहास आहे. होळी माणसाला माणुस बनवते, निसर्गाच्या सानिध्यात घेऊन. आदिवासीत्व शिकवते तेही प्रेम, सहकार्य, सेवा, पाहूणचार असं सर्वच देते, मायेच्या आशिर्वादासह.! आणि वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा व उत्साह देते. तोच होळीचा ठेवा असतो.